श्री शंकर साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची साखर आयुक्तांकडे तक्रार

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड,सदाशिवनगर, ता. माळशिरस,येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक, एनसीडीसी पुणे व साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सही असलेले निवेदन दिले आहे.या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर या कारखान्याला केंद्र सरकारची एनसीडीसी नवी दिल्लीकडून ११३ कोटी ४२ लाख रुपये रक्कम दि. १/९/२०२३ रोजी कारखान्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. या कर्जाला थक हमी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. यापैकी १७ कोटी ५० लाख रुपये आजी-माजी कर्मचाऱ्यांचे पगार व थकीत वेतन दि. ३०/९/२०२२ पर्यंत साठी दिले होते. १७ कोटी ५० लाख रुपयांपैकी आजी-माजी कर्मचाऱ्यांना अंदाजे १ कोटी ५० लाख रुपये फक्त वाटलेले आहेत. निवेदनावर सह्या केलेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्या पैशांपैकी एक रुपयाही मिळाला नाही. दोन महिन्यांपासून कारखान्याचे कार्यकारी संचालकांकडे मागणी केली आहे. तरी मागील दोन महिन्यात त्यांना तुम्ही पैसे देऊन आम्हाला एक रुपयाही देण्यात आला नाही.सह्या केलेल्या सर्वजणांनी सोलापूर कामगार न्यायालय येथे २०२१ साली कारखान्याच्या विरोधात केस दाखल केली होती. वरील न्यायालयाचा निकाल एप्रिल २०२३ रोजी सोलापूर कोर्टाने दिला आहे. या माहितीसाठी एक निकाल प्रत सोबत जोडण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाने या कर्जाला थक हमी देताना व कारखान्याला काही अटी व शर्ती पूर्ण करून घेण्यासाठी साखर आयुक्तांकडे जबाबदारी दिली होती. शासनाने त्या-त्या हेडला पैसे दिले होते. व कर्मचाऱ्यांसाठी १७ कोटी ५० लाख रुपये दिले होते. पण, कारखाना ते पैसे आम्हाला देण्यासाठी तयार नाही. इतर ठिकाणी खर्च करणार आणि तुम्हाला ११३ कोटी ४२ लाख रुपयांचा पूर्ण हिशोब देणार. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी ३० ते ३५ वर्ष या कारखान्यामध्ये सेवा केली आहे. आमच्यावर सतत अन्याय होत आहे. आता या वृद्धावस्थेमध्ये कारखान्याकडे सतत हेलपाटे व वादविवाद घालण्याची आमची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना सह्या असलेल्या सर्वजणांची रक्कम कोर्टाच्या आदेशानुसार व्याजासह एक रकमी देण्याचे आदेश पारित करावे नाहीतर कार्यकारी संचालकांवर कारवाई किंवा निलंबित करण्यात यावे.या निवेदनावर हनुमंत किसन ढगे पुरंदावडे,प्रदीपसिंह शंकरराव कदम विजयवाडी, महादेव जगु ढगे पुरंदावडे, चंद्रकांत काशिनाथ शिंदे राणंद, बापू लक्ष्मण पिसे माळशिरस, महादेव गेनबा ननवरे नातेपुते, शिवाजी यादव साळुंखे, नातेपुते भरत आनंदा गोरे कुरभावी, श्रीकांत वसंत कुलकर्णी पुरंदावडे, आबा यशवंत बंदुके मांडवे, विष्णू गुलाब रणनवरे माणकी, अरुण आबा मगर गारवाड आदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!